वैद्य. नारायणी सांगवडेकर MD (आयु)

‘त्वं ज्ञानमायो विज्ञानयोसि ।’ असे वर्णन असणाऱ्या गणपतीच्या आगमनाची चाहूल भाद्रपद महिन्यात लागते. हिंदू धर्मातील सणांमध्ये अध्यात्म व आयुर्वेद यांची सांगड आपल्याला बघायला मिळते. हा गणेशोत्सव देखील तसाच आयुर्वेद व अध्यात्माचा मिलाप असणारा सण आहे.
गणपती ही बुद्धी व समृद्धीची देवता असून गणेशोत्सवात विविध प्रकारे गणेशाची उपासना केली जाते. पठण, होम हवन, नैवेद्यासाठी गणपतीला आवडणारे मोदक, पंचखाद्य तसेच दूर्वा, जास्वंदाची फुले व २१ पत्री अर्पण केली जातात.
२१ पत्री किंवा गणेश पत्री ही पवित्र पाने गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेदरम्यान गणेशाला अर्पण केली जातात. मुद्गला आणि गणेश पुराणानुसार विविध प्रकारची २१ पाने अर्पण करावीत, असे उल्लेख सापडतात.

२१ हा श्री गणेशाचा आवडता क्रमांक आहे.
∙ आपले शरीर २१ तत्त्वांनी बनलेले आहे.
∙ पंचमहाभूत (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश)
∙ पंच ज्ञानेंद्रिय (डोळे, नाक, जीभ, कान, त्वचा)
∙ पंच कर्मेंद्रिय (हात, पाय, तोंड, गुदाशय, गुदहार)
∙ पंच तन्मात्रा आणि मन हे सर्व मिळून २१ आहेत आणि या सर्व तत्त्वांचा स्वामी गणपती आहे.
सोबतच ब्रह्मचक्राचा मूलाधार चक्राचा ठिकाणी देवता ही गणपती आहे. तसेच पत्रं म्हणजे आत्मा (SOUL) गणपतीला पत्री अर्पण करणे म्हणजे स्वतःला सर्व शक्तिमानाला अर्पण करणे आणि त्याच्यात विलीन होणे म्हणून अशा औषधीगुणधर्म युक्त वनस्पती द्रव्यांचा २१ पत्री स्वरूपात गणेशपूजेसाठी वापर केला जातो. ज्यामुळे मनुष्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. या २१ पत्रींबद्दल माहिती घेऊया.

माची (दवणा) : ही वनस्पती त्वचेचे रोग, मज्जासंस्थेचे रोग व पोटाचे रोग बरे करण्यासाठी वापरली जाते.
बृहती (डोरली) : ही वनस्पती प्राणवायू संबंधित (श्वास, कास) बद्धकोष्ठता व प्रसूतीनंरच्या काळात महिलांसाठी वापरली जाते.
बिल्व : ही वनस्पती शिवाच्या पूजेमध्ये वापरली जाते. आम अतिसार, विषाणूजन्य ताप यामध्ये वापरली जाते.
दूर्वा : त्वचारोग, रक्तस्राव थांबवण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी यांचा रस वापरतात.
धत्तूर : या वनस्पतीचा सांधेदुखी, पोटाचे आजार, त्वचा रोग, केसांचे आजार व विषारी दंश यामध्ये वार केला जातो.
बदर (बोट) : ह्याचा पचन संस्थेसंबंधित विकार, जखम, रक्त शुद्धीसाठी वापर केला जातो.
अपामार्ग (आघाडा) : ही पचनसंस्थेसंधित विकार व विषारी दंशामध्ये वापली जाते.
तुळस : ही प्राणवायुसंबंधित त्रास त्वचारोग, विषाणूजन्य ताप, हवा शुद्धी करणासाठी व विष्णू देवतेच्या पूजेसाठी वापरली जाते.
आंबा : याची पाने प्रमेह, घश्याचे आजार, पायाला भेगा पडणे यामध्ये वापरली जातात.
करवीर (कण्हेर) : ही पाने महाकुष्ठ, जखम, केसांचे त्रास व लिखा यामध्ये वापरली जातात.
विष्णूक्रांता : ही बुद्धी वाढण्यासाठी (मध्य), स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते.
दाडिम (डाळिंब) : ही आव पडणे व त्रिदोष कमी करण्यासाठी वापरली जाते.
देवदार : ही त्वचारोग, शरीरातील वात कमी करण्यासाठी व जखमांसाठी वापरली जाते.
मूर्वी : ही सांधेदुखी व त्वचारोगामध्ये वापरली जाते.
जाती (चमेली) : ही पित्त शमनासाठी, त्वचा रोग तसेच उष्णता कमी करण्यासाठी वापरली जाते.
निर्गुण्डी : ही वाताचे शमन करण्यासाठी पंचकर्मामध्ये वापरली जाते.
शमी : हिचा श्वसनाच्या समस्यांसाठी वापर केला जातो. तसेच विजयादशमीच्या दिवसी याची पूजा केली जाते.
गण्डकी (कांचनार) : ही गण्ड (घश्या) संबंधित व्याधीमध्ये वापरली जाते.
अश्वत्थ (पिंपळ) : ही मेध्य कर्म करण्यासाठी याच्या पानांवर भोजन करण्यास सांगितले जाते. तसेच रक्तस्राव रोखण्यासाठी याचा वापर केला जातो.
अर्जुन : ही हृदयरोग, सांधेदुखी त्रिदोष संबंधित व्याधीमध्ये वापर केला जातो.
अर्क : ही त्वचारोग, कुष्ठ, सांधेदुखी, विषारी दंश यामध्ये याचा वापर केला जातो.

अशा अनेक औषधीगुणधर्म युक्त वनस्पती पूजेसाठी वापरल्यानंतर नदी/जलकुंडात विसर्जित केली जाते.
हिंदू सणांमध्ये अनेक वैज्ञानिक रहस्ये आहेत. या गणेशोत्सवाला वैज्ञानिक, आध्यात्मिक, सामाजिक व पर्यावरणीय महत्त्व आहे. भाद्रपदात गणेशोत्सव साजरा होतो. हवामानाच्या परिस्थितीमुळे या हंगामात लोकांना संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते व पत्री पूजेला इथे महत्त्व आहे हे समजते. गणेशाला अर्पण केलेल्या पत्रींमध्ये औषधी गुणधर्म असल्याने या पत्रांची हवा, सुंगध (वास) आणि स्पर्शान रोगप्रतिकार शक्ती वाढते व विविध रोग बरे होतात. त्यामुळे या पत्रांना देवाला अर्पण करून ११ दिवस घरामध्ये गणेशासोबत ठेवल्यास वातावरणातील संसर्गजन्य सूक्ष्मजीव नष्ट होतात व हानिकारक जीवाणू सुद्धा नष्ट होतात. तसेच पत्रींना स्पर्श होऊन वाहणाऱ्या हवेमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
गणेशपूजेचा खरा हेतू हा आहे की, आपण निसर्गाशी नाते जोडणे त्याचा आदर करणे व निसर्गाने दिलेल्या विविध औषधी वनस्पतींचे कौतुक करणे.
तसे पाहिल्यास भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा आणि चालीरितींमध्ये मोठी विविधता आहे. भौगोलिक वितरणामुळे महाराष्ट्रात पौराणिक कथांवरील विधी आणि श्रद्धा पाळण्याऐवजी निरोगी आरोग्य राखण्यासाठी या पर्यावरणीय बदलांना स्वीकारण्यासाठी स्वतःच्या प्रथा आणि परंपरांचे पालन करतो आणि सण साजरे करतो.
सर्वांना हा गणशोत्सव आरोग्यपूर्ण व आनंददायी जावो ही श्री गणेशाचरणी प्रार्थना.

अधिक माहितीसाठी संपर्क
विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूर
विश्वपंढरी समोर, श्री सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर मार्ग, मंगळवार पेठ, कोल्हापूर-४१६०१२
फोन- २३१-२६२४०४४, ७३५०६२३६३६

Categories:

Tags:

Comments are closed